मीडियाबद्दल विरोधी पक्षाचे नक्राश्रू
राज्य सरकारने सुरु केलेले हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनाही काय दिवे लावले होते ? त्यांनी तर वृत्तपत्रांना विविध अटी लादून छोटी वृत्तपत्रे बंद करण्याचा प्रकार सुरु केला होता. माझे हे म्हणणे छोट्या वृत्तपत्रांना पटेल, असे वाटते. कारण तत्कालीन सरकारने ज्या अटी लावल्या होत्या आणि राज्य सरकारच्या विरोधात लिहिणारी अनेक छोटी वृत्तपत्रे बंद पाडण्यात आली, हे कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे फडणवीस आणि भाजपवाल्यानी मीडियाची बाजू घेऊन नक्राश्रू ढाळण्याचा हा प्रकार वाटतो.
मीडियाबद्दल विरोधी पक्षाचे नक्राश्रू
कृष्णाकाठ / अशोक सुतार
देशात गेल्या २४ तासात करोनाचे १५९४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या २९ हजार ९७४ एवढी झाली आहे. आत्तापर्यंत करोनामुळे देशात ९३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चोवीस तासात करोनामुळे ६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. आत्तापर्यंत देशभरात ७ हजार २७ करोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. २२ हजार १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पण लॉकडाउनमुळे करोनाच्या प्रसारावर काही प्रमाणात परिणाम झाला असल्याचे वेगवेगळ्या अहवालातून समोर येत आहे. मात्र, आता देशासमोर करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची चिंता उभी ठाकली आहे. गेल्या २४ तासात देशात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. देशातील आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील परिस्थिती सुधारू लागली आहे. त्यामुळे ३ मे नंतर या जिल्ह्यांना लॉकडाउनपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत सोमवारी झालेल्या बैठकीत तशी चर्चा झाली आहे. यात लॉकडाउन हटवण्यासंदर्भात राज्यांनी निर्णय घ्यावा, असे केंद्राने म्हटले आहे. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनामुळे जास्त मृत्यू होत असताना महाराष्ट्रात मात्र विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जुगलबंदी सुरु असल्याचे दिसत आहे. दोघेही आरोप- प्रत्यारोप करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा विषय राहिला बाजूला आणि नाट्याला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून राज्यात अघोषित आणीबाणी सुरु असल्याचे म्हटले आहे. सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत, असा आरोप विरोधकांनी केल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विरोधकांनी राज्य सरकारला अडचणीत आणण्याचे कारस्थान सुरु केले असल्याचे दिसत आहे. या राजकारणात राजकीय नेत्यांचे कोरोना विषयाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून विरोधकांना कोरोनाच्या गंभीर परिस्थितीचे भान नसल्याचेच दिसत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली असून राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी राज्यपालांकडे एक पत्र सोपवले. सोशल मीडियात सरकारविरोधात लिखाण करणाऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्वत्र सुरु आहेत. दुसरीकडे वृत्तपत्र वितरण सुरक्षित असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि तत्सम संस्थ्यांनी सांगितले असतानाही वृत्तपत्र वितरणावर बंदी टाकण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सुद्ध राज्य सरकारला याबद्दल जाब विचारला आहे, असे विरोधी पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. खरे तर देवेंद्र फडणवीस यांनी हा आरडाओरडा कशासाठी सुरु केला आहे, हे महाराष्ट्र जाणतो आहे. गेल्या १५ दिवसापासून विरोधी पक्षाने राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.वांद्रे येथे परप्रांतीय कामगारांचे आंदोलन झाले होते. तेव्हा विरोधी पक्षाने राज्य सरकारवर होती. परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवा, त्यांना चांगल्या सोयी मिळत नाहीत, असा आरोप भाजपच्या काही नेत्यांनी राज्य सरकारवर केला होता. त्यानंतर पालघरचे मॉब लिंचिंग झाल्यानंतर 'रिझाईन उद्धव' नावाचा हॅश टॅग वापरून सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागण्यात विरोधी पक्षनेते आणि त्यांचे पाठीराखे व मोदीभक्त आघाडीवर होते. खरे तर पालघरच्या ज्या भागात मॉब लिंचिंग घडले, त्या परिसरात भाजपचे सर्व पातळीवर वर्चस्व आहे. असे असताना राज्य सरकारवर टीका करणे गैर होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे एकूणच हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. असो. भाजपला राजकारण करायचे असेल तर ही वेळ नक्कीच नाही. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा,अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष किती सक्रिय आहे, हे फडणवीस याना दाखवायचे असेल. परंतु भाजप आणि काही नेत्यांचे वर्तन नीतिमत्तेला धरून नाही आणि लोकशाहीला शोभेसे नाही. राज्य सरकारने सोशल मीडियावर सरकारच्या विरोधात लिहिणाऱयांवर म्हणे गुन्हे दाखल केले आहेत. असे जर झाले असते तर सोशल मीडियात याची चर्चा झाली असती. पण तसे काही दिसून आलेले नाही. याचाच अर्थ राज्य सरकारवर बेछूट आरोप करणे यापलीकडे विरोधी पक्षाकडे दुसरे काही काम उरलेले नाही,असे दिसते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात अघोषित आणीबाणीसदृश आणि अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली असून लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांची मुस्कटदाबी करुन त्यांच्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. कुणी आपल्या विरोधात बोलूच नये अशी स्थिती निर्माण केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात काही प्रसारमाध्यमांचा उल्लेख करत कारवाईबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. एखादे वृत्त प्रतिकूल असेल तर त्याचा खुलासा करता येऊ शकतो. पण असे न करता थेट धमक्या देणे, अटक करणे, चौकशीचा ससेमिरा लावण्याची दहशत दाखवणे असे प्रकार सर्रास केले जात आहेत,असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली आहे. राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा विनोदी आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. भाजपा नेते विनोद तावडे, प्रवीण दरेकर, आशीष शेलार, मंगलप्रभात लोढादेखील यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारने सुरु केलेले हे प्रकार निष्पक्ष माध्यमांच्या अस्तित्वावरच घाला घालणारे आहेत. लोकशाही धोक्यात आणणारे आहेत आणि म्हणून अघोषित आणीबाणीसदृश्य आहेत. या सर्व घटनांची अतिशय गंभीर दखल घेत याबद्दल राज्य सरकारला जाब विचारावा, अशी मागणी यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनाही काय दिवे लावले होते ? त्यांनी तर वृत्तपत्रांना विविध अटी लादून छोटी वृत्तपत्रे बंद करण्याचा प्रकार सुरु केला होता. माझे हे म्हणणे छोट्या वृत्तपत्रांना पटेल, असे वाटते. कारण तत्कालीन सरकारने ज्या अटी लावल्या होत्या आणि राज्य सरकारच्या विरोधात लिहिणारी अनेक छोटी वृत्तपत्रे बंद पाडण्यात आली, हे कोणीही विसरू शकत नाही. त्यामुळे फडणवीस आणि भाजपवाल्यानी मीडियाची बाजू घेऊन नक्राश्रू ढाळण्याचा हा प्रकार वाटतो.