एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- संतोष मोरे

एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- संतोष मोरे

एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा :- संतोष मोरे.

जितेंद्र जाधव 
इंदापूर /प्रतिनिधी 

इसमाच्या अकस्मात मयत प्रकरणाची चौकशी करुन एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे यांनी निवेदनाद्वारे इंदापूरच्या पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती सर्व संबंधितांकडे पाठवण्यात आल्या आहेत.

संतोष मोरे यांनी पाठवलेल्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे या प्रकरणाची सविस्तर हकीकत अशी की, श्रीकांत विठ्ठल मोरे (वय ३२ वर्षे, रा. देवडे, ता. पंढरपूर, जि.सोलापूर) हा इसम दि. १७/०९/२०२३ रोजी रात्री  ९ वाजून १० मिनीटांनी इंदापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मरण पावला. तशी नोंद इंदापूर पोलीस ठाण्याच्या अकस्मात मयत दप्तरी करण्यात आली. त्या इसमाचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे कारण देण्यात आले नाही.

देशपांडे व्हेज या हॉटेलजवळ पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. हे काम करणा-या एन.पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीने त्या भागात अनेक ठिकाणी खड्डे घेतलेले आहेत. त्या खड्ड्यांमध्ये आपल्या दुचाकीसह पडल्याने गंभीर जखमी होवून श्रीकांत मोरे हे मयत झाले आहेत, असा संतोष मोरे यांचा दावा आहे. रस्त्याचे काम सुरु असताना त्या कंपनीने कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी न घेतल्याने मोरे यांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे त्यांच्या मृत्युस सर्वस्वी एन.पी. इन्फ्राप्रोजेक्टस प्रा. लि. कंपनीच जबाबदार आहे. 

त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. त्या कंपनीवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मार्गावरुन ये जा करणाऱ्या  प्रवाशांच्या जिवीतास हेतूपुरस्पर जीवघेणा धोका निर्माण केल्याच्या करणावरुन ही गुन्हा दाखल करण्यात यावा. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून मयत व्यक्तीच्या कुटूंबाला न्याय मिळवून दयावा अशी मागणी संतोष मोरे यांनी केली आहे.

 

सतत वादग्रस्त कंपनी...!!

एन.पी.इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. ही कंपनी ज्या वेळेपासून चालू झाली त्या वेळेपासूनच वादग्रस्त होत चाललेली आहे. तिच्या विरोधात सुमारे दीडशेहून जास्त तक्रारी महसूल व खनिकर्म विभागाच्या टेबलवर धूळ खात पडल्या आहेत. आत्तातर हे नवीन प्रकरण उद्भवल्यामुळे कंपनीविषयीच्या बदलौकिकात अधिकची भर पडल्याचे चित्र आहे.