नगरपालिकेतर्फे शहरातील पाच ठिकाणी सुभोभीत कारंजाची उभारणी
कराड/प्रतिनिधी :
येथील कराड नगरपालिकेने स्वच्छ अभियानांतर्गत शहरातील चौक सुशोभीकरणाचा संकल्प केला आहे. त्यानुसार नगरपालिकेने शहरातील विवीध चौकट कारंजे, विविध फुलझाडे, गद्दी बांधकाम आदींद्वारे शुभारंभ करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार नगरपालिकेतर्फे शहरातील पाच ठिकाणी आकर्षक कारंजे उभारण्यात येणार असून यातील पंचायत समिती, नूतन प्रशासकीय इमारत, रेव्हिन्यू क्लब व उंडाळकर पुतळ्यादरम्याच्या चौकट नगरपालिकेने उभारलेल्या कारंजाचे लोकार्पण करण्यात आले.
नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचे औचित्य साधून शहर स्वच्छ, सुंदर हरित व सुशोभित करण्यासाठी पावले टाकली असून गृरुवारी 19 रोजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांच्या हस्ते या कारंजाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजयसिंह यादव, पाणी पुरवठा सभापती अर्चना ढेकळे, बांधकाम सभापती हणमंतराव पवार, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, गटनेते सौरभ पाटील, नगरसेवक बाळासाहेब यादव, सुहास जगताप, किरण पाटील, प्रियांका यादव, वैभव हिंगमिरे, विद्या पावसकर, जयंत बेडेकर, निशांत ढेकळे, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, रफीक भालदार, ए. आर. पवार, मिलिंद शिंदे, धन्वंतरी साळुंखे आदी उपस्थित होते.
स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत कराड शहर स्वच्छ करण्याबरोबरच सुंदर आणि सुशोभित करण्यासाठी नगरपालिकेने हाती घेतलेल्या उपक्रमाबाबत यावेळी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कराड नगरपालिकेने 2020 मध्ये प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली असून यांतर्गत\ शहर स्वच्छ करण्याबरोबरच सुंदर व सुशोभित करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. या अंतर्गत शहरात रेव्हिन्यू क्लबसमोरचा चौक, कोल्हापूर नाका, कृष्णा नाका, प्रीतिसंगम उद्यान, बारा डबरी येथील कचरा डेपो या ठिकाणी रंगीबेरंगी पाण्याची उधळण करणारे आकर्षक कारंजे उभारण्यात येणार आहेत. यातील रेव्हिन्यू क्लबसमोरच्या चौकात सुमारे 2 लाख रूपये खर्चून पाच नोझलचा कारंजा उभारण्यात आला आहे. तर अन्य उर्वरित कारंजे येत्या आठवडाभरात सुरू करण्यात येणार आहेत.
तसेच शासनाने स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहरातील धुळीचे प्रमाण, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या उपक्रमांतर्गत नगरपालिकेने शहरातील धुळीचे प्रमाण, वायू प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्न केला असून शहरातील पाच ठिकाणी हे कारंजे उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरात नगरपालिका व विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्ती माध्यमातून विविध ठिकाणी श्रमदान करून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून त्यात नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.