पहिल्या खेपेच्या गरोदर मातांसाठी प्रधान मंत्री मातृ वंदना योजना ठरली नवसंजीवनी
पहिल्या खेपेच्या गरोदर मातांसाठीप्रधान मंत्री मातृ वंदना योजना ठरली नवसंजीवनी
सातारा / प्रतिनिधी
कोरोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत 2 कोटी 74 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात 27 कोटी 72 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.केंद्रशासन पुरस्कृत प्रधान मंत्री मातृ वंदना योजना हि सन २०१७ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये लाभार्थ्यांना त्यांच्या बुडीत रोजगाराची प्रतिपूर्ती आणि गरोदरपणाच्या कालावधीत मातेला आराम मिळावा तसेच सुयोग्य आहार मिळावा या करीता रु. ५००० चा लाभ देण्यात येतो. सर्व प्रवर्गातील व सर्व आर्थिक स्तरांमधील लाभार्थींना या योजनेचा लाभ देण्यात येतो. मात्र हा लाभ कोणत्याही शासकीय सेवेतील असणाऱ्या अधिकारी वा कर्मचारी याना मिळत नाही.
जिल्ह्यामध्ये २५ ऑगस्ट २०२० पर्यंत एकूण ६५६८९ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण २७ कोटी ७२ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात ज्या कालावधीत पूर्णपणे लॉकडाऊन होते त्या कालावधीत देखील या योजनेमध्ये ५९३४ इतक्या लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये २ कोटी ७४ लाख रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आलेले आहे.या योजनेचा लाभ प्राप्त करण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांची गरोदरपणाची नोंदणी १०० दिवसाच्या आत आशा कार्यकर्ती किंवा आरोग्य सेविका यांचे कडे करणे बंधनकारक असते. तालुकानिहाय लाभार्थी नोंदणी व अनुदान वाटप पुढील प्रमाणे करण्यात आले आहे
१ जावली २४७९ १ कोटी ७ लाख
२ कराड १११६० ४ कोटी ९९ लाख
३ खंडाळा ३०१३ १ कोटी ९ लाख
४ खटाव ६२४२ २ कोटी ४५ लाख
५ कोरेगाव ६०८३ २ कोटी ६५ लाख
६ महाबळेश्वर ८८० ३३ लाख ७३ हजार
७ माण ४५५७ १ कोटी ७९ लाख
८ पाटण ७८३३ ३ कोटी ४३ लाख
९ फलटण ५७८२ २ कोटी २७ लाख
१० सातारा ८८६४ ३ कोटी ७५ लाख
११ वाई १२७० १ कोटी ८६ लाख
१२ शहरी कराड १४० ५२ लाख
१३ शहरी महाबळेश्वर ९७५ ५ लाख ६१ हजार
१४ शहरी पाटण १९५३ ४२ लाख ८५ हजार
१५ शहरी सातारा ३५७ ८३ लाख ८ हजार
१६ शहरी वाई ४१०१ १३ लाख ३७ हजार
एकूण ६५६८९ २७ कोटी ७२ लाख
सतीश साळुंके,जिल्हा कार्यक्रम समन्वयक याबाबत म्हणाले की लाभार्थ्यांना आवाहन आहे कि, लाभार्थी या योजनेमध्ये शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ७३० दिवसापर्यंत लाभ मिळवू शकतात. त्या नंतर त्यांना लाभ मिळणे शक्य नसते. लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागपत्राची पूर्तता वेळेत करावी. त्यामुळे योजनेचा उद्देश साध्य होईल. दुसरा हप्ता तिसरा हप्ता प्रलंबित असणारे लाभार्थी यांनी आपले कागदपत्र त्वरित जमा करावेत. तसेच आरोग्य कर्मचारी यांचेशी समन्वय साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून फॉर्म मध्ये आवश्यक बदल करून घ्यावेत. तसेच आपले खाते आधार शी सीडेड आहे याची खात्री करावी.
डॉ. प्रमोद शिर्के जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी या संदर्भात म्हणाले की खाजगी रुग्णालयात जाणारे लाभार्थी यांनी स्वतःची नोंदणी हि शासकीय आरोग्य संस्थेत करून घ्यावी जेणेकरून त्यांची नोंदणी या योजनेमध्ये होईल आणि त्यांना याचा लाभ घेणे सोईचे होईल.डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी अधिक माहिती देताना म्हणाले की जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जे लाभार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून या जिल्ह्यात आले असतील त्यांनी त्यांचे योग्य दस्तऐवज सादर करून योजनेमध्ये स्वतःचे नाव नोंदवावे. जेणेकरून त्यांना नियमाप्रमाणे लाभ मिळेल. सर्व यंत्रणा अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहे. नागरिकांना आवाहन आहे कि त्यांनी प्रशासनास समर्थपणे साथ द्यावी. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांचे याबाबत महत्त्वाचे मार्गदर्शन लाभत आहे